औरंगाबाद: दहावी परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच पंधरा वर्षीय साक्षी अशोक पांढरे या विद्यार्थिनीने निकालाच्या भीतीने आत्महत्या केली. शनिवारी दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला आणि त्यात साक्षी पांढरे ही ५३.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याचे समोर आले आहे. मात्र, हे यश पहायला आज ती या जगात नाही.
शहरातील गारखेडा परिसरातील विजयनगरमध्ये राहणारी साक्षी पांढरे ही उल्कानगरी भागातील विश्वभारती कॉलनीत असलेल्या जय भवानी विद्यामंदिरमध्ये शिकत होती. तिने मार्च महिन्यात दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षेत पेपर अवघड गेल्याने ती तणावात होती. आपण परीक्षेत पास होऊ की नाही, या भीतीने साक्षी हिने गेल्या सोमवारी ३ जून रोजी सकाळी आठच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. साक्षीचे वडील अशोक पांढरे हे एका कंपनीच्या गाडीवर चालक असून, तिची आई धुण्या-भांड्याचे काम करते. तिचा मोठा भाऊ अभियांत्रिकीचे शिक्षण घेतो. साक्षीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पांढरे कुटुंब शोकसागरात बुडाले. काल शनिवारी दहावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला. त्यात साक्षीला ५३.६० टक्के गुण मिळाल्याचे समोर आले.
साक्षीने कुठलाही विचार न करता निकालाच्या तणावातून आपले जीवनच एका क्षणात संपवून टाकले. मात्र, तिला दहावीत नापास होण्याची जी भीती सतावत होती ती निरर्थक होती, हे निकालानंतर स्पष्ट झाले. दहावीचा निकाल प्रत्यक्ष जाहीर झाला आणि ती उत्तीर्ण झाली. मात्र, हे यश पाहण्यासाठी आज साक्षी जिवंत नाही.आज ती हयात असती तर खूप काही करू शकली असती. तिने आत्महत्या करायला नको होती, असे तिचे निकटवर्तीय सांगतात.
आत्महत्या हा पर्याय नव्हे
दहावी- बारावी परीक्षा हा केवळ जीवनाचा एक भाग आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असे म्हटले जाते;परंतु अनेक विद्यार्थी तणावात येऊन आत्महत्या करतात. काही विद्यार्थी अपयश आले की, निराश होऊन जीवन संपवून टाकतात; परंतु आत्महत्या हा पर्याय नव्हे. पालकांनी विद्यार्थ्यांना समजून घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांनीही स्पर्धेच्या युगात अपयश आले तरी खचून न जाता जोमाने पुन्हा अभ्यास करून पुढे गेले पाहिजे.
साक्षीने असे करायला नको होते..!
साक्षी पहिल्यापासूनच वर्गात हुशार होती. ती आत्महत्या करेल, असे वाटलेही नव्हते. साक्षी दहावी परीक्षेत चांगल्या मार्काने पास झाली आहे. साक्षी परीक्षेच्या निकालाविषयी तणावात होती तर किमान तिने मैत्रिणीला तरी सांगायला हवे होते. शिक्षकांना सांगितले असते तर तिला आम्ही समजावून सांगितले असते. ती उत्तीर्ण झाली; परंतु हे यश पहायला ती आज या जगात नाही, अशी खंत जय भवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक दत्तात्रय पवार यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना व्यक्त केली. जीवनात अनेक परीक्षा येतात-जातात. विद्यार्थ्यांनी निराश होऊन कुठलेही टोकाचे पाऊल उचलू नये. कुठलीही समस्या असेल तर घरातल्या लोकांशी, शिक्षकांशी चर्चा केली पाहिजे. समस्येतून मार्ग नक्कीच काढता येईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.